“आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली प्रेमापोटीची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतले:
आज भारतात या महाआजाराच्या संकटामुळे जगभरातील कामगार वर्ग व मजूरांचा आपल्या मायदेशी जाण्याचे चित्र अनेक ठिकाणी आपल्याला दिसत आहे, हे समजल्या नंतर वर्धा येथील ‘सचिन’ने पूढाकार घेत त्या गरीब हातावर पोट असल्या कामगारांना विनंती केल्यावर दीडशेवर परप्रांतीय गावातच थांबण्यास तयार झाले. जय महाकाली संस्थेचे सचिन अग्निहोत्री व वैद्यकीय मंचचे डॉ. सचिन पावडे या दोघांनी केलेली विनवणी प्रशासनास दिलासा देणारी ठरली.
राजस्थान, मध्यप्रदेश व तेलंगणा येथील कामगार व मजूर वर्ग वर्ध्यात कार्यरत आहेत. मात्र रोजगार ठप्प पडल्याने ते परतीच्या प्रवासाला निघाले होते. प्रशासनाची विनंती त्यांनी धुडकावली. हे दीडशेवर कुटुंब रस्त्याने निघाले असतांनाच अग्निहोत्री व पावडे यांना या विषया बद्दलची माहिती मिळताच त्या लोकांनकडे धाव घेतली त्यांना समजवण्यात आले रस्त्याने जाणे धोकादायक आहे आणि हे सांगितले की तुमच्या राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. वाटेत खाण्यापिण्याचे वांदे होतील. हे संकट झेलण्यापेक्षा तुम्ही कामाशिवाय राहाल तितके दिवस आम्ही तुमला सांभाळून घेऊ, अशी विनंती या दोघांनी केली. आम्हाला आपला मुलगाच समजा, अशी साद त्यांनी महिलांना घातली मग या कुटूंबांनी परत आपल्या झोपडीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
आर्वी नाका परिसरातील तेलंगणातील मजुरांना डॉ. पावडे यांनी ५ किलो तांदूळ व अन्य साहित्य देऊन अन्नपाण्याची व्यवस्था केली. नंतर सचिन अग्निहोत्री यांनी राजस्थानी व मध्य प्रदेशातील मजुरांकडे मोर्चा वळवला. प्रत्येक कुटूंबाला एका पोत्यात ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, तसेच कणीक, साखर, तेल, डाळ, जिरा पावडर, चणा, वटाणा, पोहे अशा विविध २१ वस्तूंचा ८२० रूपये किमतीचा शिधा दिला. ही मदत पाहून गहिवरलेल्या राजस्थानी महिला चक्क पाया पडायला लागल्या तेव्हा त्यांना धीर देण्यात आला.
स्वयंपाकाची चूल व भांडीकुंडी मजूरांकडे होतीच. यापुढील टप्यात वर्धेतील झोपडपट्टी वसाहतीत १०० कुटूंबांना उद्यापासून धान्य देण्याचे काम वैद्यकीय मंचातर्फे होणार असल्याचे डॉ. पावडे यांनी सांगितले, तर गावातील भिकाऱ्यांना एका ठिकाणी जमा करून त्यांच्या थेट भोजणाची व्यवस्था करण्याचे ठरले असल्याचे अग्निहोत्री यांनी सांगितले, या प्रकरणी प्रशासनाने आमची मदत मागितलेली नव्हती. आम्हीच हे काम करण्यासाठी प्रशासनाला केवळ लेखी संमतीपत्र मागितल्याचे या दोघांनी सांगितले. आम्हाला याचा गवगवा नकोच, असेही ते प्रांजळपणे म्हणाले. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी या कार्यामूळे प्रशासनावरील ताण कमी झाल्याचे मान्य केले. स्वयंस्फूर्तीने मदत करणाऱ्यांची खरच आज यावेळी गरजच आहे असे त्यांनी नमूद केले.