एपी.एम.सी. भाजीमार्केट खारघरमध्ये स्थलांतर ; प्रशासनांनी घेतला मोठा निर्णय सिडकोने त्वरीत उपलब्ध करुन दिला भूखंड:
एपी.एम.सी. भाजीमार्केट खारघरमध्ये स्थलांतर ; प्रशासनांनी घेतला मोठा निर्णय सिडकोने त्वरीत उपलब्ध करुन दिला भूखंड:
वाशीतील एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला आणि फळ मार्केट खारघरला हलवण्यात येणार आहे. खारघरच्या सेंट्रल पार्कजवळ असलेल्या मोकळ्या मैदानावर हे मार्केट तात्पुरत्या स्वरुपात हलवण्यात येणार आहे. सिडकोने ५० एकर भूखंड उपलब्ध करून दिला आहे, तसेच १ हजार चौरस फुटांचे जवळ जवळ १२०० ते १३०० गाळे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
एपीएमसी मार्केट प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वारंवार सांगून देखील एपीएमसी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने भाजीपाला आणि फळ मार्केट हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, बाजार समिती सचिव अनिल चव्हाण आणि एपीएमसीच्या इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये आता किरकोळ खरेदीदारांना आत सोडण्यावर बंदी घातलण्यात आली आहे. फक्त होलसेलर यांनाच आत सोडण्यात येणार आहे. तसेच, मार्केटमधील गर्दी कमी झाली नाही तर संपूर्ण मार्केटच खारघर येथे हलवण्यात येईल, असा निर्णय मार्केट प्रशासनाने घेतला आहे.
तसंच, एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला आवारात फक्त ३०० गाड्यांना सोडण्यात येणार आहे. जर नियमांचे पालन केले नाही तर परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये असलेले सर्व घाऊक व्यापारी आणि इतर घटकांनी जर हे नियम तोडले तर भाजीपाला आणि फळ मार्केटच्या जवळपास २००० व्यापाऱ्यांना खारघर येथील सेंट्रल पार्कच्या जवळ असलेल्या मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात मार्केट उभं करण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे.