कोरोना महासंकट : नवी मुंबईती ५० टक्के कोरोनाग्रस्त मुंबईच्या संपर्कामुळे ; लाखो नागरिक हे कामानिमित्त जातात मुंबई शहरात :
कोरोना महासंकट : नवी मुंबईती ५० टक्के कोरोनाग्रस्त मुंबईच्या संपर्कामुळे ; लाखो नागरिक हे कामानिमित्त जातात मुंबई शहरात :
नवी मुंबई शहरातून लाखो नागरिक हे कामानिमित्त दररोज मुंबई शहरात जातात
नवी मुंबई : नवी मुंबईत करोना रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढ होत असून रविवापर्यंत रुग्णांची संख्या ही १३१ पर्यंत गेली आहे. यातील ५० टक्के म्हणजे ६६ करोना रुग्ण मुंबई शहरातील संसर्गामुळे बाधित झालेले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतून दररोज मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्यांमुळे नवी मुंबईतील रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे.
नवी मुंबई शहरातून लाखो नागरिक हे कामानिमित्त दररोज मुंबई शहरात येत जात असतात. त्यांचे राहण्याचे ठिकाण हे नवी मुंबई पण कामाचे ठिकाण मात्र मुंबई आहे. सध्या करोनामुळे लॉकडाउन असले तरी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, पोलीस असे अनेकजण मुंबईमध्ये कामानिमित्त जात आहेत. ते करोनाबाधितांच्या संपर्कात येत आहेत. ते आपल्या घरी आल्यानंतर कुटुंबालाही बाधा करीत आहेत. नवी मुंबई सीवूड्स सेक्टर ५० येथे एकत्र कुटुंबात १७ जण राहतात. या कुटुंबातील एक डॉक्टर भायखळा येथील रुग्णालयात काम करतात. ते तेथील रुग्णालयात करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने या डॉक्टरांना करोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांचे अख्खं कुटुंबच करोनाबाधित झालं आहे.कुटुंबातील १७ जणांपैकी १४ जणांना संसर्ग झाला आहे. त्यांच्यात लहान बाळाचाही समावेश आहे.
करावे येथील करोनाबाधित मुंबईतील शिवडीच्या एका रुग्णालयात काम करतात. तर नेरुळ सेक्टर ८ येथील करोनाबाधित मुंबईतील राजावाडी रुग्णालयातील डॉक्टर आहेत. मुंबई शहरातील एका मोठय़ा मॉलमध्ये व्यवस्थापक पदावर काम करणारे एकजण करोनाबाधित झाले आहेत. असे अनेकजण मुंबईमध्ये करोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने व ते नवी मुंबईत रहिवाशी असल्याने त्यांच्या कुटुंबाीयांनाही करोना संसर्ग झाला आहे. १३१ करोना रुग्णांमध्ये अशा प्रकार संसर्ग झालेले ६६ रुग्ण आहेत.
महानगरपालिकेने नवी मुंबईत समूह संपर्काचा प्रकार नसल्याचे सांगितले आहे. मात्र मुंबईतील संपर्कामुळे रुग्ण वाढत असल्याने ही एक चिंतेची बाब व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे वारंवार आवाहन करूनही आजही अनेकजण घरा बाहेर पडत आहेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.