कोरोना महासंकट : गृहमंत्री देशमुख यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला; ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, असे लोक सुद्धा जेव्हा या पद्धतीनं राजकारण करतात:
कोरोना महासंकट : गृहमंत्री देशमुख यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला; ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, असे लोक सुद्धा जेव्हा या पद्धतीनं राजकारण करतात:
नवी मुंबई (बातमी मुंबई) : लॉकडाउनच्या काळात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या कपिल वाधवान यांना प्रवासासाठी पत्र दिल्याच्या प्रकरणाचा अहवाल अखेर समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला असून, त्याविषयी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुकलाईव्हद्वारे संवाद साधत माहिती दिली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या राजकारणावरून देशमुख यांनी टीकाही केली.
कपिल वाधवान आणि त्यांना प्रवासासाठी शिफारस पत्र दिल्याच्या प्रकरणाची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. “या सर्व प्रकरणामध्ये अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार लॉकडाउनच्या काळात वाधवान कुटुंबीयांना मुंबईहून महाबळेश्वरला जाण्यासाठी मंत्रालयातून जे पत्र देण्यात आलं होतं, स्वतः आपणच दिल्याचं अमिताभ गुप्ता यांनी कबूल केलं आहे. हे देताना त्यांच्यावर कुणाचाही दबाव नव्हता, असंही त्यांनी चौकशीत म्हटलं आहे. या प्रकरणाची फाईल तयार होईल आणि ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाईल. त्यानतंतर यावर निर्णय होईल. त्याचबरोबर हा चौकशी अहवाल पुढील काळात सार्वजनिक करण्यात येईल,” असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
“देश आणि महाराष्ट्र करोनाशी लढत आहे. अशा परिस्थितीत कोणतंही राजकारण न करता, सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आजच्या परिस्थिती राजकारण बाजूला ठेवून लढलं पाहिजे असं म्हणाले होते. असं असताना काही मंडळी, त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरचं किंवा नगर पालिका स्तरावर राजकारणं करणारा मी समजू शकतो. पण, ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, असे लोक सुद्धा जेव्हा या पद्धतीनं राजकारण करतात, ही अतिशय दुखद अशी गोष्ट आहे,” असा टोला गृहमंत्री देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता लगावला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.