कोरोना महासंकट : देशभरात लॉकडाउन हळूहळू शिथिल होईल ; पण एकदम उठवणे अयोग्य :
नवी मुंबई : भारतात ८० टक्के रुग्णांना करोना विषाणूची लक्षणे नाही आहेत. स्थलांतरित आणि लॉकडाउन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ग्रामीण भागातही करोना विषाणूचा प्रादुर्भाव आता दिसू लागला आहे. राज्याचे अर्थचक्र सुरू करण्यासाठी लॉकडाउन शिथिल करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी ही वाढणार आहे हे लक्षात घेऊन करोना विषाणू नियंत्रणासाठी जास्त गांभीर्याने काम करा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. नागपूर, यवतमाळ, सोलापूर, पुणे, सातारा, ठाणे आदी जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांशी चर्चा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही महत्वपूर्ण सूचना दिल्या.
महाराष्ट्रातील कोरोना विषाणूची रुग्ण संख्या ही मोठी असली तरी दिलासादायक बातमी म्हणजे कोरोना रुग्ण झपाटय़ाने बरे देखील होत आहेत. फिल्ड हॉस्पिटल, पल्स ऑक्सीमीटरचा वापर, प्लाझ्मा थेरपी, ८० टक्के बेड्स राखीव ठेवणे, शंभर टक्के कॅशलेस उपचार, व इतर काही गोष्टी प्रभावी ठरत आहेत. त्यात महाराष्ट्र देशात आदर्श निर्माण करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
कमी जास्त होणाऱ्या आकडेवारीपेक्षा तुम्ही रुग्णांना काय सुविधा देत आहात , त्यांना कसे बरे करीत आहात, उपचारांचे कसे नियोजन केले आहे, याला महत्त्व आहे. संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांची नियमित तपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनपातळी पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासावी, रक्तदाबाकडे लक्ष ठेवावे. चाचणी ही लक्ष्य केंद्रित असावी. जास्तीत जास्त मोठय़ा प्रमाणावर घराघरांत सर्वेक्षण करून रुग्ण शोधणे खूप गरजेचे आहे. रुग्णाला रुग्णालयातून सोडण्याबाबत कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे. त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळेस सांगितले.
आपण लॉकडाउन हळूहळू शिथिल करीत आहोत. ते एकदम उठविणे अयोग्य आहे. काय काय सुरू करत आहोत त्याविषयी नागरिकांमध्ये स्पष्ट कल्पना पूर्वीपासून असावी. त्यात अटी-शर्ती असाव्यात. त्या पाळल्या गेल्या नाहीत तर परत टाळेबंदी करावी लागेल याची कल्पना असणे गरजेचे आहे. म्हणजे संभ्रम राहणार नाही. आता काही दिवसात शैक्षणिक वर्ष देखील सुरू होत आहे. पुढच्या १० दिवसांत ऑनलाईन शिक्षणाचे प्रायोगिक प्रकल्प सुरू करता येतात का हे पाहावे लागेल, असेही मुख्यमंत्री यावेळेस म्हणाले.
कोरोना रुग्णांना मोफत उपचार :
प्रतिकार शक्ती आपण कशी वाढवतो, रुग्णांना त्यादृष्टीने सुविधा कशा देतो ते महत्वाचे आहे. सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य या देशातील महत्त्वाकांक्षी योजनेची प्रत्येक जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.