कोरोना महासंकट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद ; जून ३० नंतर लॉकडाऊन उठणार नाही :
कोरोना महासंकट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद ; जून ३० नंतर लॉकडाऊन उठणार नाही :
नवी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज २८ जून रोजी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला, ३० जूनला लॉकडाऊन उठणार नाही, काळजीपूर्वक काही गोष्टी सुरु करत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले की, कोरोना विषाणूंची संख्या वाढत आहे. भाजी मंडईसह काही ठिकाणी होणारी गर्दी हा चिंतेचा विषय आहे. जर तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असेही ते म्हणाले. काही जिल्ह्यांमधून समोरुन लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आली आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यावेळेस म्हणाले. लॉकडाऊन हा शब्द मी वापरत नसलो तरी काही बंधनं मात्र आपल्याला स्वत:वर घालावी लागतील, आपल्याला शिस्तीची जास्त गरज आहे. मुलांची, ज्येष्ठांची काळजी घेताना तरुण बाहेर पडत आहेत. त्यांना लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यामुळे अन्य लोकांना बाधा होऊ शकते. काळजी घेणे अपरिहार्य आहे, असं ते म्हणाले आहेत. आपण जे मिशन बिगेन अगेन सुरु केलंय पण धोका टळलेला नाही. आपण कात्रीत सापडलो आहोत. पण आपल्याला संकटावर मात ही करायची आहे. एखादी गोष्ट उघडली म्हणजे धोका टळलाय असं नाही, असं ते यावेळेस म्हणाले.
शेतकऱ्यांचा मुद्दा :
बोगस बियाणांच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शेतकरी अपार कष्ट करुन बियाणं पेरतो आणि ते उगवत नाही. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्यावर कारवाई होणार. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्याकडून वसूली करुन नुकसानभरपाई देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकरी मरमर राबून, अफाट मेहनत करून अन्न पिकवतोय आपल्यासाठी. त्या संदर्भात बी - बियाणं बोगस असल्याच्या तक्रारी येणे हे दुर्दैवी. मेहनत करून पीक आलं नाही तर काय करणार? मी शेतकरी दादाला सांगतो, काळजी करू नका, असंही ते म्हणाले.
कोरोना संकटात सोळा हजार कोटींचा करार :
कोरोनाच्या संकटातही सुमारे सोळा हजार कोटींचे करार महाराष्ट्राने केले आहेत. नवीन उद्योगधंदे आल्यावर अर्थचक्राला गती आणि माझ्या भूमीपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल. कोरोना एके कोरोना असे आपण करीत नाही आहोत. काही अटीतटी - शर्थी जटील न ठेवता आपण त्यांचे स्वागत करीत आहोत. उद्योजकांनो, महाराष्ट्रात या, तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करा, असं आवाहन त्यांनी केलं.
लॉकडाऊनचा नेमका अर्थ काय...???
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपणहून कोविडला बळी पडू नका. सुरक्षित अंतर ठेवा, हात तोंडाला सारखे लावू नका. सुविधा, शिथिलता ह्या आरोग्यासाठी दिल्या आहेत, आजाराला बळी करण्यासाठी नाही. गरज नसताना बाहेर पडलात तर परत लॉकडाऊन करावे लागेल. आता प्रश्न तुम्हांला आहे, लॉकडाऊन करायचे का? असा सवाल त्यांनी केला.
पावसाळा चालू झाला आहे सर्वानी काळजी घ्यावी:
तसेच ते पुढे म्हणाले की, शहरी भागात मी विशेष सांगतो, हे जे पावसाळ्याचे दिवस आहेत हे मलेरिया व डेंग्युचे दिवस आहेत. आपली यंत्रणा आज कोविड विरुद्धच्या युद्धात गुंग आहेत. व्यग्र आहेत. सर्वांना विनंती आहे, कुठेही पाणी साठू देऊ नका. डेंग्युच्या आळ्या ह्या अगदी एका बुचातील साठलेल्य पाण्यापासुन कोठेही होऊ शकतात. आता पावसाळा सुरू झालेला आहे. नवीन अंकुर येतात, पालवी फुटते, हिरवे गालिचे पसरतात. पावसाळा एक नवीन जीवन घेऊन येतो. आणि या चांगल्या गोष्टींसह काही वाईटही घेऊन येतो. त्या दृष्टीने येणार्या नैसर्गिक आपत्ती जसे पूर, वादळ , साथीचे रोग घेऊन येतो. आपण त्या धरतीवरही तयारी करत आहोत, असं ते म्हणाले.
प्लाझ्मा थेरपीचा वापर कसा???
उद्या कदाचित प्लाझ्मा थेरपीचा वापर करणारे आपले राज्य पहिले ठरेल. प्लाझ्मा हा कोणाचा वापरू शकतो? कोरोना होऊन बरे झालेत, त्यांच्या शरीरात ॲन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत त्या रक्तगटानुरुप आपण वापरू शकतो. रक्तदानाप्रमाणे कोरोना बरा होऊन घरी गेलेल्या रुग्णांना विनंती आहे प्लाझ्मादान नक्की करा.
डॉक्टर आणि शेतकरी यांना धन्यवाद :
उद्धवजी पुढे म्हणाले की, १ तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. तसेच वसंतराव नाईक यांची जयंती देखील आहे. हा आठवडा शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करु. शेतकरी आणि डॉक्टरांसाठी हा दिवस साजरा करुन त्यांच्या कार्याला सलाम करुयात, असं ही ठाकरे यांनी म्हटलं आहे. योगायोगाने १ तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकरी दिन आहे जो आपले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ साजरा करतो. त्यांना अभिवादन करुन शेतकर्यांना, अन्नदात्याला मी सलाम करतो, धन्यवाद देतो. परवा १ तारीख आहे, त्या दिवशी आपल्यासाठी लढणार्या सर्व डॉक्टर्स चा दिवस आहे. मी त्यांना धन्यवाद देतो व आपण त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहु असे वचन देतो.
मुख्यमंत्री स्वता आषाढीच्या वारीला जाणार:
मुख्यमंत्री म्हणाले की, तुमच्या वतीने मी आषाढीच्या वारीला जाणार आहे. केवळ महाराष्ट्रासाठी नाहीतर अवघ्या देशासाठी, जगासाठी निरोगी आयुष्यासाठी साकडे घालणार आहे. वारकर्यांनो तुमचे आशीर्वाद पाठीशी राहु द्या, तुमचे आशीर्वाद घेऊन तुमच्या वतिने मी विठुरायाचे आशीर्वाद घ्यायला जातोय. मी वारी हेलिकॉप्टरमधुन एरियल फोटोग्राफीद्वारे केली. मला त्या अथांग अवकाशातुन सर्व विसरुन विठुमाऊलीच्या गजरात दंग झालेल्या वारकऱ्यांच्या रुपातुन मला विठ्ठलाचे दर्शन झाले, विश्वरुप दिसले. वारकर्यांना सांगतो, नाईलाजास्तव वारीचा सोहळा आटोपशीर करावा लागतोय, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे व विषय:
१)अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका.
२)बोगस बियांणाच्या तक्रारी येत आहेत हे दुर्देवी.
३)उरलेल्या शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्ती दिली जाणार.
४)मी आषाढी वारीला पूजेसाठी जाणार. विठुरायाला साकडं घालण्यासाठी मी जाणार आहे.
५)दहिहंडी उत्सव स्वताहून रद्द केला. ही खरी सामाजिक जाणीव.
६)गणेशोत्सव मंडळांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद
७)विसर्जनाची किंवा प्रतिष्ठापनेची मिरवणूक काढू नका
८)मूर्ती लहान करण्याचा निर्णय कौतुकास्पद
९)प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करणारं देशातलं सर्वात मोठं राज्य महाराष्ट्र असेल
१०)कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढं यावं
११)लढणं हे आपल्या रक्तात आहे, आता रक्तदान करुन आपला लढाऊपणा सिद्ध करा
१३)रेमडेसिवीर आणि अन्य औषधं मोफत उपलब्ध करुन देणार
१४)चेस द व्हायरस ही संकल्पना मुंबईत सुरु
१५)अद्याप कोरोनाचं संकट टळलेलं नाही
१६)अर्थचक्राला गती दिल्यानंतर कोरोना संख्या वाढणारच आहे
१७)ज्येष्ठ डॉक्टरांनी काळजी घेऊन काम करावं
१८)पाऊस आला की नवचैतन्यासोबत काही समस्याही घेऊन येतो, मात्र आपली तयारी सुरु आहे
१९)या दिवसात अन्य रोगांचीही भीती आहे, त्यामुळं काळजी घ्या
२०)उद्योजकांसाठी महाराष्ट्राचं दार उघडं, संकटामध्ये उद्योजकांना महाराष्ट्र आपला वाटतो. तुम्ही या पण भूमिपुत्रांना रोजगार द्या
२१)शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरु करण्यावर भर.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.