कोरोना अपडेट : काँग्रेसच्या ११ आमदार नाराज उपोषणाला बसण्याचा निर्णय; ठाकरे सरकारसमोर मोठं आव्हान :
काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल हे राज्यातील ठाकरे सरकारवर नाराज आहेत. ठाकरे सरकार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याने उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नवी मुंबई (बातमी/मुंबई) : ठाकरे सरकारमधील मानापमान नाट्य काही थांबताना दिसत नाही. निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतलं जात नाही हा काँग्रेसने घेतलेला आक्षेप ताजा असतानाच आता निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या काही आमदारांनी केला आहे. या आमदारांनी सरकारच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे.
काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल ठाकरे सरकारवर नाराज आहे. ठाकरे सरकार निधी वाटपात दुजाभाव करत आहे. त्यावर आम्ही नाराज आहोत. सर्वांना मतदारसंघात काम करायचं आहे. त्यामुळे निधी वाटप समानपद्धतीने झालं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. आम्ही राज्यातील काँग्रेस नेतृत्वाकडे आमची नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील ११ आमदार नाराज असून आम्ही उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कैलास गोरंट्याल यांनी दिली.
तसेच राज्यात निधीचं समान वाटप होणार नसल्याची तक्रार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे करण्यात येणार असून त्याबाबत सोनिया गांधींची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गोरंट्याल यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्य सरकारसमोरचं विघ्न वाढलं आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक महत्त्व दिलं जात असल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत भेट घेतली होती. मात्र, त्यांना ठाकरे यांनी लवकर भेट दिली नसल्याने काँग्रेसमध्ये आणखीनच अस्वस्थता पसरली होती. अखेर ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काँग्रेस नेते बॅकफूटवर गेले होते. त्यानंतर न विचारताच अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याचा आक्षेप घेत चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीही ठाकरे यांना काँग्रेस नेत्यांची समजूत काढताना तारेवरची कसरत करावी लागली होती. आता थेट काँग्रेसच्या ११ आमदारांनी निधी वाटपावर असमाधान व्यक्त करत नाराजी दर्शवल्याने ठाकरे सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.