न्यूज अपडेट : ग्राहकांना दिलासा; नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये कांद्याच्या भावामधे ३० रुपयांची घसरण:
न्यूज अपडेट : ग्राहकांना दिलासा; नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये कांद्याच्या भावामधे ३० रुपयांची घसरण:
● नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारा मध्ये आज १२५ गाड्यांची आवक झाली असून त्यापैकी ७६ गाड्या भरुन कांदा दाखल झाला आहे.
नवी मुंबई (प्रतिनिधि) :- नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केटमध्ये घाऊक बाजारात आज १२५ गाड्यांची आवक झाली असून त्यापैकी ७६ गाड्या भरुन कांदा दाखल झाला आहे. त्यामुळे कांद्याचे दर काहीशा प्रमाणात कमी झाल्याचे पाहाला मिळाले.
गेल्या सात दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले होते. कांदा हा ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. आज मार्केटमध्ये कांदा ६० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला उठाव नसल्याने कांद्याच्या दरात ३० रुपयांची घसरण झाली असल्याचे काही व्यापारी सांगतात.
३० वर्षांपासून कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले की, “काही व्यापारी अनधिकृतपणे कांद्याची साठवणूक करून दरवर्षी दसरा-दिवाळी सणाच्या वेळी कांद्याच्या दरात वाढ करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच शेतकऱ्यांकडून कमी दरात कांदा विकत घेऊन बाजारात जास्त दराने त्याची विक्री करत असतात”.
यामध्ये शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही, असेही तोतलानी यांनी सांगितले. कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण करुन कांद्याचा भाव वाढवला जातो. शेतकऱ्याला मात्र चांगला दर मिळत नाही. परिणामी शेतकरी हा कंगाल तर व्यापारी मालामाल होत आहे.
सध्या मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या दरात ३० रुपयांची घसरण झाली असून ६० ते ७० रुपये किलोने कांदा विकला जात आहे. तसेच नाफेड, इजिप्त, इराण या ठिकाणांहून आलेल्या कांद्यालादेखील उठाव नसल्याने हा कांदा बाजारात पडून आहे. इजिप्त आणि इराणमधून एकूण ५० टन कांदा आला असून हा कांदा ५० ते ६० रुपये किलोच्या दराने विकला जात आहे. परंतु बाजारात ग्राहक नसल्याने कांद्याला उठाव नाही.
सध्यचा कांद्याचा भाव..?
नवीन कांदा : २० ते ६० रुपये कि.लो.
नाफेडवरून आलेला कांदा : २५ ते ५० रुपये कि.लो.
इराण व इजिप्तवरून आलेला कांदा : ५५ ते ६० रुपये कि.लो.
मध्यप्रदेशमधून आलेला कांदा : ५५ ते ६० रुपये कि.लो.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.