न्यूज अपडेट : परवानगी न घेता वृक्षतोड केल्यास एफ.आय.आर. दाखल होणार..!!
नवी मुंबई (विशेष प्रतिनिधि) :- वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा -हास रोखण्यासाठी वृक्षतोड थांबणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नवीन वृक्षारोपण करण्यासोबतच वृक्षतोड रोखण्याकडेही विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. त्यामुळे अत्यावश्यक कारणासाठी जरी एखादे झाड तोडणे गरजेचे असले अथवा वृक्ष छाटणी करावयाची असेल तरी त्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणा-या वृक्ष प्राधिकरणाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असते. तथापि, अनेकदा अशाप्रकारची परवानगी न घेताच वृक्ष तोड करणे अथवा वृक्ष छाटणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येते.
अशाप्रकारे विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करून पर्यावरणाला हानी पोहचविणे हा गुन्हा असून याबाबत अदखलपात्र गुन्हा (N.C.) नोंदविला जात होता. मात्र याबाबत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 अन्वये गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अशाप्रकारे विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करणा-यांवर नियमानुसार दखलपात्र गुन्हे (F.I.R.) नोंद करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकारी यांना देण्याविषयी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती केलेली आहे.
त्यास अनुसरून आता महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 मधील कलम 2 (ग) व 3 तसेच महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 आणि महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन नियम 2009 सह शासन आदेश अधिसूचना मधील कलम 21(1) व 2 नुसार विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करणा-यांवर दखलपात्र गुन्हे (F.I.R.) दाखल करण्यात येणार आहेत.
संबंधित विभाग कार्यालय क्षेत्रातील उद्यान अधिक्षकांमार्फत हे दखलपात्र गुन्हे (F.I.R.) दाखल करणे व या नोंदीत गुन्ह्यांसंदर्भात न्यायालयीन प्रकरणांबाबत महानगरपालिकेचा विधी विभाग आणि तालिका वकील यांच्याशी समन्वय ठेवून प्रकरणांचा निपटारा करण्याची जबाबदारी आपापल्या परिमंडळांसाठी परिमंडळ 1 व 2 च्या प्रभारी उद्यान अधिकारी यांचेवर सोपविण्यात आलेली आहे.
अशाप्रकारे विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करणा-यांवर यापुढे दखलपात्र गुन्हे (F.I.R.) नोंदविले जाणार असल्याने असे बेकायदेशीर कृत्य करणा-या व्यक्तींवर वचक बसणार असून वृक्ष व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने उचललेले हे एक महत्वाचे पाऊल आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.