न्यूज अपडेट :- एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचा दुजोरा देणारे आणि त्यांच्या जाण्याने पक्षाचे फार काही बिघडणार नाही..!!
न्यूज अपडेट :- एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचा दुजोरा देणारे आणि त्यांच्या जाण्याने पक्षाचे फार काही बिघडणार नाही..!!
नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- अखेर भाजपमधील आणखी एका नाथाने पक्ष सोडून जाण्याचे जाहीर केले. खरं तर राजकीय पक्षाच्या जीवनात नेते जाणे-येणे सुरूच असते. मात्र खडसे यांचे भाजपातून जाणे रावसाहेब दानवे म्हणतात इतके सहज आणि सोपे घेण्यासारखे नाही. ही गोष्ट आज दानवे जाणून असले तरी त्यांना ती खुलेपणाने मान्य करणे शक्य नाही.
कारण ते आज जरी सुपात असले तर उद्या जात्यात असतील, अशीच स्थिती आहे. असो. खडसे यांच्या राजीनाम्याचा दुजोरा देणारे आणि त्यांच्या जाण्याने पक्षाचे फार काही बिघडणार नाही, असा आव आणणारे केशव उपाध्ये यांचेच बघाना हेच उपाध्ये गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या आगेमागे करायचे. बरं या अशा नेत्यांची पार्श्वभूमी काय…त्यांनी पक्षासाठी किती आणि कुठे, कशी झीज केली, त्यांचा जनाधार काय या गोष्टींना भाजपात आता महत्व राहिले नाही. मुंबई वगळता ज्याची राज्यात कुठेही ओळख नाही, त्याला विधानपरिषद विरोधी पक्षनेता, ज्यांनी आयुष्यात कधीही थेट निवडणूक लढविली नाही ( कोथरूडचा अपघात वगळता ) अशा चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश भाजपचे सूत्रे हलवायची. ही कोण लोक आहेत. कोणी म्हणेल ते बालपणापासून हाफचड्डी घालून शिबिर करत होते ( ते वाईट आहे असे नाही मात्र राजकीय जीवनात पुरेसेही नाही ) ..किंवा त्यांच्या सामाजिक समरसतेसाठीच्या अनेक कथा रंगवल्या जातील. ते किती काळ एका पदावर निष्ठेने राहिले, त्यांनी स्वतःची भाकरी बांधून प्रसार केला वगैरे ..वगैरे… मात्र या लोकांनी राजकीय पक्ष म्हणून भाजपसाठी खाल्लेल्या खस्ता, झेलल्या लाठ्या, भोगलेले तुरुंगवास किती आणि केव्हा हे विचारायचे नाही हे कसे चालेल. केवळ कॅमेऱ्यासमोर येऊन खोडसाळपणे बोलणे, इतरांचे जुनी उणीदुणी काढणे हेच पाहून आता राजकारणात स्थान दिले जाणार काय ?
ज्या गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हा परिषदेपासून राजकारण सुरु केले. ज्या एकनाथ खडसेंनी ग्रामपंचायतीपासून राजकीय धडे गिरविले, त्यांना तुम्ही ज्ञान पाजळणारे कोण ? असा सवाल विचारणे कुण्या एखाद्या राजकीय पक्षाची तळी उचलणे होऊ शकत नाही. मुंडे-खडसे यांना देण्यात आलेली वागणूक सर्वानी पहिली आहे, आज माध्यमांसमोर येऊन खोडसाळ वृत्तीतून आम्ही त्यांना थांबविले, संवाद साधला असे म्हणणे निव्वळ ठोंगीपणा, कोडगेपणाचा कळस आहे.
गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांनी हजारो कार्यकर्ते घडविले, अनेकांना आमदार-खासदार करण्याची त्यांची क्षमता होती… नगरसेवक म्हणूनही निवडून येऊ शकत नसताना केवळ पक्षाच्या करिष्म्यावर नेते झाल्याचे अनेकांचे भास भविष्यात उतरतील. एकनाथ खडसे भाजपातून गेले नाही तर त्यांना घालविण्यात आले. आज जर ते हयातीत असते तर स्व. गोपीनाथ मुंडे यांचेही हेच झाले असते. आता बारी ती पंकजावर आहे. विनायक मेटेंना बळ कोण देतेय, भाजपाची सत्ता असतांना विरोधीपक्षात असलेल्या धनंजय मुंडेंना बळ देत कुणी उभे केले, पंकजा समर्थकांची कोंडी कशी सुरू आहे. वंजारी समाजातून नवे नेतृत्व उभे करण्यासाठी कोणाला आणि कशाच्या बळावर खासदार-आमदार करण्यात आले.
हे सर्व स्पष्ट असताना आता पंकजा मुंडेंवर काय वेळ येईल हे सांगाल ? कुण्या भविष्यकाराची गरज उरली नाही. असो भाजपचा विरोधक म्हणून नव्हे तर त्याने काय गमावलंय हे सांगण्याचा मी माझ्या अल्प ज्ञानानुसार प्रयत्न केला. गोपीनाथ आणि एकनाथ या दोन्ही नावामध्ये ‘नाथ’ होता, हा नाथ आता भाजपमधून निघून गेलाय. मुंडे-फुंडकर -खडसे या तिघांची राजकीय कारकीर्द ऐनभरात असताना मला राजकारण कळायला लागले. आज या तीनही नावांनी जवळपास भाजपच्या राजकीय पटलावरून एक्झिट घेतल्याच्या विचारांनी मनात ”रामचंद्र कह गाये सियासे ऐसा कलयुग आयेगा ” हे वाक्य रुंजी घालत आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.