न्यूज अपडेट : रेल्वे स्थानकात कुल्हडमध्येच चहा ; केंद्रीय मंत्री पियुष गोयल..!!
नवी मुंबई (बातमी/जयपूर) :- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. येणाऱ्या काळात देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर कुल्हडमध्येच चहा मिळणार असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे. प्लास्टिक कपला पर्याय म्हणून कुल्हडमध्ये चहा देण्यात येईल, स्टेशनवर प्लास्टिक कप पूर्णपणे बंद होणार असल्याचं ते म्हणाले.
राजस्थानच्या अलवरमध्ये ढिगावडा-बांदीकुई रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण उद्घाटन सोहळ्यात गोयल यांनी ही घोषणा केली. सध्या देशात जवळपास ४०० रेल्वे स्टेशन्सवर कुल्हडमधूनच चहा दिला जातो. येत्या काळात देशातील प्रत्येक स्टेशनवर केवळ कुल्हडमधूनच चहाची विक्री केली जाईल, अशी योजना आहे. प्लास्टिक मुक्त भारतमध्ये रेल्वेचं हे योगदान असणार आहे. तसंच या योजनेमुळे हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचंही गोयल म्हणाले.
आधीच्या काळात रेल्वे स्थानकांत कुल्हडमधूनच चहा दिला जात होता. ज्यावेळी २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आलं, तोपर्यंत कुल्हड गायब झाले होते आणि प्लास्टिक कपमध्ये चहा देण्यास सुरुवात झाली होती. खादी ग्रामोद्योग विभागातील लोकांनी रेल्वेसोबत मिळून या कार्याला गती दिली असल्याचंही गोयल यांनी सांगितलं.
कुल्हडमध्ये चहा पिण्याचा स्वाद वेगळाच असतो आणि पर्यावरणालाही आपण वाचवतो. पंतप्रधान मोदी २०१४ पासून सत्तेत आले, तेव्हापासून ते लोकांच्या आरोग्याप्रती चिंतेत आहेत, असंही गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.