न्यूज अपडेट : रंगचित्रांतून साकारल्या नागरिकांच्या मनातील स्वच्छ नवी मुंबईच्या संकल्पना..!!
नवी मुंबई (प्रतिनिधि/किरण पवार) :- स्वच्छतेमध्ये लोकसहभागाचे महत्व अनन्यसाधारण असून प्रत्येक माणसाने स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे हे ओळखून स्वच्छता ही आपल्या दैनंदिन जगण्याची नियमित सवय करून घ्यावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत.
यामध्ये नवी मुंबईकरांच्या स्वच्छताविषयक कलात्मक जाणीवांना भक्कम व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व भित्तीचित्र / म्युरल्स स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या. अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजात ढोले आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दोन्ही स्पर्धांच्या ठिकाणी भेट देऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
वंडर्स पार्क नेरूळ येथे संपन्न झालेल्या चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी माजी सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे उपस्थित होते. वंडर्स पार्क येथील चित्रकला स्पर्धेत १० ते १५ वयोगटातील ५७ तसेच १५ वर्षावरील ९ स्पर्धकांनी सहभागी होत 'स्वच्छ भारत - स्वच्छ नवी मुंबई' संकल्पनेवर आधारित आपल्या भावना चित्ररूपांत साकारल्या. कोव्हीडच्या काळातील निरूत्साही वातावरणातून बाहेर पडण्यासाठी ही चित्रकला स्पर्धा उपयोगी ठरल्याची भावना अनेक स्पर्धकांनी व्यक्त केली.
सेक्टर १६, वाशी येथील नाला पार्कींग लगतच्या भिंतीवर भित्तीचित्र काढणे स्पर्धेमध्ये २० चित्रकारांनी सहभागी होत स्वच्छतेच्या विविधरंगी भावना भित्तीचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित केल्या. स्वच्छतेत अग्रणी असलेल्या नवी मुंबई शहराचा नावलौकिक उंचविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हेच जणू या चित्रकारांनी आपल्या भित्तीचित्रातून स्पष्ट केले. 'निश्चय केला - नंबर पहिला' हे ध्येय नजरेसमोर ठेवून 'स्वच्छ सर्वेक्षण - २०२१' ला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज असून प्रतिभावंत कलाकार नागरिकांच्या मनातील स्वच्छतेची संकल्पना साकारण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्राशी संबंधित या दोन्ही स्पर्धा कोव्हीडच्या काळातही नागरिकांचे अंगभूत कलागुणांना मुक्त व्यसपीठ मिळवून देणा-या ठरल्या तसेच यामधून नागरिकांच्या मनातील स्वच्छ नवी मुंबईचे चित्रदर्शनही यामधून घडले.
स्पर्धेच्या आयोजन कार्यात श्रीम. धनश्री देसाई आणि श्री. रोहित शास्त्री यांचे महत्वाचे योगदान लाभले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.