न्यूज अपडेट : काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदासाठी नाना पटोलेंची निवड निश्चित..??
● नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
नवी मुंबई (प्रतिनिधी/वीरेंद्र म्हात्रे) :- राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या हायकमांडने नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचे नाव निश्चित केले आहे. आता यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी दिल्लीत राहुल गांधी पत्रकारपरिषद घेणार आहेत. यावेळी नाना पटोले यांच्या नावाची घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विदर्भातील मंत्र्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद द्या, बाळू धानोरकरांची फील्डिंग कोणासाठी?
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला विदर्भात यश मिळाल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत उडी घेतली होती. ‘काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील मंत्र्याला मिळावं’ अशी मागणी धानोरकरांनी केली आहे. बाळू धानोरकर यांनी हायकमांडची भेट घेत विदर्भासाठी दावेदारी केली.
नाना पटोलेंना का प्राधान्य?
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा आहे.
‘महाराष्ट्रात ‘फायटर’ प्रदेशाध्यक्ष द्या’
महाराष्ट्रात काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करायची ठरवल्यास तो लढाऊ बाण्याचा असावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली होती. विदर्भात काँग्रेस पक्ष मजबूत आहे. त्यामुळे विदर्भाचा अध्यक्ष झाल्यास आनंद वाटेल, असेही त्यांनी म्हटले होते.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.