न्यूज अपडेट: नवोदित साहित्यिक, कलाकारांना लाभले हक्काचे नाविन्यपूर्ण व्यासपीठ:
मुंबई (विशेष प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- प्रेम म्हटले की आपल्या समोर उभे राहते राधा कृष्णाचे निस्सीम प्रेम. अशा ह्या निस्सीम, पवित्र प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. हाच दृष्टिकोन, ह्याच भावना शब्दात उतरवण्यासाठी "भावना तुमच्या मनातल्या" हा विशेष उपक्रम युवा साहित्यसंपदा आणि अखिल भांडुप कलाकार कट्टा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ओपन माईकच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे कोणत्याही साहित्य प्रकाराचे बंधन नव्हते सदर कार्यक्रमास नव्हते. कलाकारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना मनमोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी व्यासपीठावर देण्यात आली. सदर कार्यक्रमात सादरीकरण झालेल्या कलाकृतीतून प्रेम फक्त प्रेयसी किंवा प्रियकर ह्यांच्या पुरतं मर्यादित न राहता प्रेमाची व्यापक व्याप्ती मांडली गेली.
कार्यक्रमाची सुरवात समीर नार्वेकर ह्यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली. सदर प्रसंगी प्रमुख निमंत्रित म्हणून अनुपमा पाटील (असिस्टंट कमिशनर ऑफ फूड अँड ड्रग्स अडमिनीस्ट्रेशन, मुंबई) ह्यांनी नटराजाच्या मूर्तीला हार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. अखिल भांडुप कलाकार कट्टा पदाधिकारी महेश तावडे ह्यांनी अश्या उपक्रमांतून युवापिढीला व्यासपीठ उपलब्ध होते असे मत व्यक्त करताना नवोदितांनी जास्तीत जास्त आपल्या कला गुणांना वाव द्यावा, असे आवाहन केले. मुलांनी चाकोरीबद्ध न जगता, स्वतःचा मार्ग निवडून काही नवी करू देणाऱ्या पालकांचा सुद्धा सत्कार साहित्यसंपदा तर्फे करण्यात आला. त्याअंतर्गत नियोजन क्षेत्रातील विश्वासू नाव बनलेल्या "मनोमय मीडिया" आणि समाजात विविध उपक्रम राबविणाऱ्या "शिवधारा ट्रेकर्सचे" संस्थापक राहुल तवटे ह्यांच्या पालकांचा रमेश तवटे व रंजना तवटे ह्यांचा गौरव साहित्यसंपदा जेष्ठ सदस्य सुरेंद्र बालंखे, स्वाती पेटकर ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पुस्तकरत्न पुरस्कार विजेते श्रीकांत पेटकर, कृष्णप्रित चारोळीकार प्राजक्ता हेदे बोवलेकर, लेखिका वंदना मत्रे सदर कार्यक्रमास विशेष उपस्थित होते.
आजकाल तरुणांनी मराठीकडे पाठ फिरवली आहे, मुलांना मराठी साहित्याची आवड नाही, असे मत व्यक्त होताना दिसते. ह्याचा सारासार विचार करून मराठी संवर्धनासाठी, पुढील पिढीला मराठी साहित्याची आवड निर्माण होण्यासाठी आणि तरुणांच्या सहभागातून सृजन समाज निर्मिती होण्यासाठी साहित्यसंपदाचे संस्थापक वैभव धनावडे ह्यांच्या संकल्पनेतून साहित्यसंपदा युवा समूहाची निर्मिती अवघ्या काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. योग्य मार्गदर्शन आणि मेहनत ह्यांच्या जोरावर साहित्यसंपदा युवा समूहातील अश्विनी केंजळे, सोनाली शेडे ह्यांनी कार्यक्रमाची उत्तम रूपरेषा सादर केली.
साहित्यसंपदा युवा सदस्या अक्षता कदम, ऋचा निलिमा, सुकृती पेटकर ह्यांनी खुमासदार निवेदन सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. साहित्यसंपदा प्रशासकीय समितीमधील नमिता जोशी, वैशाली कदम आणि अनुपमा पाटील ह्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाची जोड त्यांना निवेदनास लाभली.
गीतकार, गायक संतोष सकपाळ ह्यांनी आपल्या सुरेल आवाजातून मनामनात जगण्याचा आशावाद जागवून विशेष दाद मिळवली. कवयित्री सीमा पाटील, कवयित्री स्मिता हार्डीकर, कवयित्री अस्मिता सावंत ह्यांनी आपल्या कविता सादरीकरणातून श्रोत्यांना खिळवून ठेवले. प्रार्थना बालंखे , रेश्मा पवार, विदिशा तवसाळकर ह्यांनी कवितांचे उत्तमोत्तम सादरीकरण केले. गायक मिलिंद ठाकूर यांचे गझल गायन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. आपल्या सुरेल आवाजातून त्यांनी उपस्थितांच्या मनाला भुरळ पाडली. गायक व पेटीवादक मिलिंद ठाकूर , तबलावादक अभिजीत वाघमारे ह्यांची त्यांना उत्तम साथ लाभली. कट्यार काळजात घुसली फेम बालकलाकार सुजय बागवे ह्याने आपल्या सादरीकरणातून उपस्थितांची विशेष वाहवा मिळवली.
साहित्यसंपदा आणि अखिल भांडुप कलाकार कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या "भावना तुमच्या मनातल्या" ओपन माईक कार्यक्रमाने अनेक कलाकृतींचा आस्वाद उपस्थितांना घेता आला. कविता, लेख, गद्य, पद्य, गीत, अनुभव अशा विविध माध्यमातून सहभागी कलाकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन टाकले. अखिल भांडुप कलाकार कट्ट्याच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा उत्तम रीतीने सांभाळताना संदीप मसुरकर आणि तुषार केळुसकर यांनी नयनरम्य व्यासपीठ सजावट, ध्वनी व प्रकाशयोजना करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. संयुक्त विद्यमाने अनेक विविध उपक्रम पार पाडले जाऊन भरीव कार्य नवोदितांसाठी केले जाईल असा विश्वास दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मनावर रेंगाळणाऱ्या सुंदर कार्यक्रमास उपस्थित राहिल्याचे समाधान प्रत्येकाच्या नजरेत दिसत होते.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.