न्यूज अपडेट: मराठी भाषा वाढली पाहिजे..ती टिकली पाहिजे..पण कशी..??
नवी मुंबई (बार्शी/अनिल देशपांडे) :- आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत आहोत...सर्व सामान्य लोकांसाठी मराठी अजून उपलब्धच नाही हे या ठिकाणी खेदाने म्हणावे वाटते.
एखादया मध्यमवर्गीय कुटूंबात ज्यावेळी मुल जन्मते त्यावेळी त्या नवराबायकोचा पहिला प्रश्न हा वासून उभा रहातो की आपल्याला बाळाला कोणत्या इंग्लिश मिडीयम मध्ये घालायचे? आणि इथूनच आपल्या मराठी भाषेची फरफड चालू होते.
उच्च शिक्षित, उच्च मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय या सर्वाचा प्रथम कल हा इंग्लिश माध्यमाच्या शाळातून मुलांना शिक्षण देण्याकडे कल असतो, आणि ही मुले जशी जशी मोठी होत जातात तसे तसे पालकांना आणि मुलाना कळते की आपल्याला यातील काहीच आता येत नाही. मग आपली चूक झाली हे पालकांच्या लक्षात येते आणि त्यावेळी वेळ खूप पुढे जाऊन त्या बालकाचे नुकसान झालेलं असतं.
बालकांना जो पर्यंत मातृभाषेतून १+१=२ हा कन्सेप्ट पक्का होत नाही तो पर्यंत त्याला जगातील कोणत्याच भाषेतून काही कळणार नाही...मराठी साठी आग्रह धरणारे फक्त गावातील दुकानाच्या पाट्या इंग्रजी च्या ऐवजी मराठी मध्ये करण्यासाठी आग्रह धरतात पण त्यातून मूळ प्रश्न सुटत नाही. मराठी ही सर्वसामान्यांची भाषा झाली पाहिजे.
आज आपल्याला मिळणारे पॅन कार्ड, कोर्टाचे निकाल, वाहन परवाने काढण्यासाठी भरावे लागणारे फॉर्म, शाळा महाविद्यालयातील भरावे लागणारे प्रवेश फॉर्म, बोर्डाच्या विद्यापीठाच्या गुणपत्रिका या मराठी भाषेतून होण्यासाठी आपण आग्रही झाले पाहिजे, जो पर्यंत आपली भाषा सर्वसमावेशक (friendly user) होत नाही. तो पर्यत ती समाजात बसत नाही.
अनेक गोष्टीचे परवाने मागणीचे आवेदने इंग्रजी मध्ये असल्याने एजंटराज फोफावत रहाते तेच परवाने आपल्या मातृभाषेतून असतील तर सर्वसामान्यांना काय लिहीतोय आणि काय माहिती भरतोय हेही कळत नाही मग हेच का आपले भाषेवरील प्रेम.
मराठी वाढली पाहिजे, टिकली पाहिजे आणि रुळी पाहिजे.
!! मराठी राजभाषा दिनाच्या सर्वाना शुभेच्छा !!
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.