न्यूज अपडेट: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन:
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे नुकतेच पुण्यातीळ सह्याद्री रुग्णालयात निधन झाले आहे. त्या खूप दिवसांपासून आजारी होत्या असे वृत्त हाती येत आहे. त्यांच्या कासव चित्रपटाने ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ पुरस्कार जिंकला होता. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीला खूप मोठी हानी झाली आहे.सुमित्रा भावे या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक होत्या. त्यांनी एकूण सुमारे १४ चित्रपट, ५० हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांवर. या सर्व मालिकांचे लिखाण भावेंचे आहे. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम.ए केले. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदविका मिळविलेली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले होते. पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत कम्युनिटी अँड स्पॉन्सरशिपच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या.
सुमित्रा भावे यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका होत्या. सुमित्रा भावे यांनी वयाची नुकतीच ७५ वर्षे पूर्ण केलेली होती. आजही या वयात अतिशय धडाडीने त्या सिनेसृष्टीत कार्यरत होत्या.
सूमित्रा भावे यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले-
दिठी, दहावी फ, अस्तु, एक कप च्या, कासव, घो मला असला हवा, जिंदगी जिंदाबाद (हिंदी), देवराई, दोघी, नितळ, फिर जिंदगी (हिंदी लघुपट), बाधा, बेवक्त बारिश (हिंदी लघुपट). मोर देखने जंगल में (हिंदी माहितीवजा कथापट), वास्तुपुरुष, संहिता, हा भारत माझा या काही निवडक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.
त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.सिनेमा क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. साहित्य कला आणि चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.