न्यूज अपडेट: जागतिक मलेरिया दिन - २५ एप्रिल २०२१..!!
नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- कोरोना संक्रमणामुळे भारतामध्ये मलेरिया आजाराविषयी वाढत आहे जनजागृती गेल्या २० वर्षात मलेरिया रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असलेला भारत हा एकमेव देश
मुंबई- मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी व त्याच्या नियंत्रणासाठी जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी २५ एप्रिल रोजी जगभरात " जागतिक मलेरिया दिन " पाळला जातो, परंतु आजच्या घडीला कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगासमोर ठाकले असून मलेरियासारख्या जीवघेण्या आजारावर जनजागृती होत असल्याचे दिसत आहे. एकेकाळी कोरोना एवढी दहशत असलेला मलेरिया आजाराने मृत्युदर वाढताना दिसत होते व आजही जगभरामध्ये मलेरिया आजारांमुळे होणारे मृत्यू थांबलेले नाहीत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मलेरियाने आजही दर दुसऱ्या मिनिटाला एका मुलाचा मृत्यू होतो तर दरवर्षी २० कोटी नागरिकांना मलेरियाचा संसर्ग होतो. याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व फिजीशियन आणि इंटेंसिव्हिस्ट डॉ. प्रदीप शेलार म्हणाले युनिसेफने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे १२०० मुले रोज मृत्यूमुखी पडतात. मलेरिया हा विषाणूंपासून संक्रमित होतो. अॅनोफिलिस (मादी) या जातीचा डास चावल्याने, त्यांच्याद्वारा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात व मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मलेरियावर मात करणे शक्य असले तरीही मलेरीया हा एक धोकादायक आजार आजही आहे.
ताप, डोकेदुखी आणि थंडी वाजणे, ही मलेरियाची प्राथमिक लक्षणं आहेत. मलेरियाचा डास चावल्यानंतर १० -१५ दिवसात ही लक्षणं दिसतात , सध्या कोरोना संक्रमणाचा काळ असून कोरोनाची सुद्धा हीच लक्षणे आहेत त्यामुळे उगाच वेळ न दवडता योग्य वेळी वैद्यकीय चाचण्या करणे महत्वाचे आहे. अनोफिल्स डासांच्या मादीमुळे मलेरिया होतो. अनोफिल्स डासांच्या चारशेहून जास्त प्रजाती आहेत. यातल्या जवळपास ३० प्रजाती मलेरियाच्या फैलावासाठी कारणीभूत ठरतात.हे डास सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी येतात. त्यावेळी मलेरिया पसरवणारे हे मलेरिया व्हेटर चावण्याची शक्यता सर्वाधिक असते. मलेरियावर उपचार करून तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.
मायक्रोस्कोप किंवा रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट या दोन पद्धतीने पॅरासाईट वर आधारित निदान करता येतं. या पद्धतीने अर्धा तास किंवा त्याहूनही कमी वेळेत एखाद्याला मलेरिया आहे किंवा नाही, याचं खात्रीशीर निदान करता येतं. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जितक्या लवकर निदान करून उपाचर होईल तेवढी आजार बळावण्याची आणि रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होते. तसंच मलेरियाच्या प्रसाराला अटकाव घालता येऊ शकतो. भारतामध्ये कोरोनाचे संक्रमण वाढल्यानंतर वैद्यकीय चाचण्या व तपासण्यामध्ये वाढ झाल्यामुळे अनेक राज्यामध्ये मलेरियाचे रुग्ण पहिल्या स्टेजला सापडल्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये मलेरियामुळे होणाऱ्या मृत्युदरात घट झाली आहे." भारतानं हिवताप अर्थात मलेरिया नियंत्रणात उल्लेखनीय काम केलं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
गणिती मांडणी वर आधारित आणि जगभरातील मलेरिया आजाराच्या रुग्ण संख्येचे अंदाज वर्तवणार्या मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल २०२० हा डब्ल्यूएचओने प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार भारताने मलेरियाचा धोका कमी करण्यात सातत्यपूर्ण यश मिळवले आहे. भारतामध्ये मलेरियाची रुग्णसंख्या २० लाखांवरून ६ लाखांपर्यंत कमी झाली आहे. २००० ते २०१९ पर्यंत मलेरियाच्या रुग्णसंख्येचा टक्का ७१.८ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. मलेरियाने होणार्या मृत्यूंचे प्रमाणही ७३.९ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. भारतामध्ये २००० मध्ये मलेरियाचे २० लाख ३१ हजार ७९० रुग्ण होत. तर ९३२ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०१९ मध्ये हे प्रमाण ३ लाख ३८ हजार ४९४ रुग्णांवर आले असून, ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१८ ला ४ लाख २९ हजार ९२८ रुग्ण तर ९६ जणांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये ३ लाख ३८ हजार ४९४ रुग्ण, तर ७७ जणांचा मृत्यू झाला होता. यातून दोन्ही वर्षामध्ये रुग्ण व मृत्यूच्या प्रमाणामध्ये अनुक्रमे २१.२७ टक्के आणि २० टक्के घट झाल्याचे दिसून येते. २०२० मध्ये मलेरिया रुग्णसंख्या ऑक्टोबरपर्यंत १ लाख ५७ हजार २८४ आहे. मलेरिया रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असलेला भारत एकमेव देश आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.