न्यूज अपडेट: १५ जून पर्यंत राज्यात लॉकडाऊन नसून कडक निर्बंध कायम:
नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- राज्यात असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणखी १५ दिवसांसाठी वाढवला आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन हा आता १५ जूनपर्यंत असणार आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांनी लाईव्हच्या माध्यमातून जनतेला दिली. मे महिन्यात काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली तर काही ठिकाणी रुग्णवाढ झाली. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागातील निर्बंध आणखी कडक करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांनाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल-
■ महाराष्ट्रातील ज्या क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या क्षेत्रात खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
■ सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.
■ सर्व आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील. ई-कॉमर्स सेवा सुरू राहील.
■ वैद्यकीय सेवा सुरू असतील परंतु दुपारी ३ नंतर विनाकारण येण्या-जाण्यावर निर्बंध असतील.
■ शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जास्त उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देऊ शकतो.
■ कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील.
■ कोरोनाबधित रुग्णांचे प्रमाण जास्त असलेल्या क्षेत्रात लॉकडाऊन कायम
■ महाराष्ट्रातील ज्या क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तिथे निर्बंध कडक करण्यात आले आहेत
■ कोरोनरुग्ण जास्त असलेल्या जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही.
■ केवळ वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा प्रवास करण्यात अपवाद असेल.
■ दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नसतील. ठरवून दिलेल्यावेळेतच बाजारपेठ सुरु असेल. दिलेल्यावेळे नंतर दुकाने सुरू ठेवल्यास कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तो पर्यंत दुकान बंद ठेवण्यात येईल व दंड घेण्यात येईल. ठरवलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरू असेल.
अश्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील लॉकडाऊनच्या नियमांची मांडणी जनतेसमोर केली आहे. आता ह्या नियमांचे पालन जनता कश्याप्रकारे करते हे येत्या दिवसात दिसून येईल.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.