न्यूज अपडेट: आता उठसुठ कोरोना चाचणी करता येणार नाही; राज्य सरकारच्या नव्या सूचना:
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशासह राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक रुगांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता राज्य सरकारने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून तज्ज्ञांनी वर्तवलेल्या तिसऱ्या लाटेचा धोका वेळीच ओळखून परिथिती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. याबाबत उठसुठ कोणालाही कोरोना चाचणी करता येणार नाही, असं भाष्य राजेश टोपे यांनी केलं आहे.
‘राज्यात उठसूट कुणाचीही कोरोना चाचणी करणं आता पूर्णपणे बंद करण्यासाठीच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हाय रिस्क आणि कमी धोका असलेल्या व्यक्तींच्याच कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी कोरोना चाचण्या केल्यानं पॉझिटिव्हीटी रेटवर परिणाम होतो,’ असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
सध्याच्या स्थितीला राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट एकूण राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे, त्यांना दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यातील पहिली म्हणजे, होम आयसोलेशन १०० टक्के बंद करुन कोविड सेंटर वाढवा आणि तिथे रुग्णांना आयसोलेट करा. त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. तसेच राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्यास प्राधान्य देणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.