न्यूज अपडेट: लढा भूमीपुत्रांचा, ध्यास दि.बा.पाटील नावाचा..!!
नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- महाराष्ट्र असलेली ७२० किमी लांब एवढी कोकणकिनारपट्टी ही फार विशाल आहे. ह्याच कोकणकिनारपट्टीत असलेली पालघर, ठाणे, रायगड हे विभाग सर्वांना ज्ञात असतीलच. या विभागात असलेले आगरी , कोळी, कराडी, कुणबी, तटकरी, आदिवासी समाज म्हणजे परंपरेचा वारसा जपणारे स्रोतच आहेत. भारत देशातच नव्हे तर सबंध जगभरात अश्या व्यक्ती होऊन गेल्यात ज्यांच्यामुळे त्या समाजाला न्याय व हक्क मिळालेत. अर्थातच ती व्यक्ती समाजाची आधारस्तंभ बनते. त्याच प्रमाणे आगरी कोळी कराडी समाजातील स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देऊन समाजाचा उद्धार करणारे माजी खासदार स्व. दि.बा.पाटील हे या समाजाचे दैवत मानले जातात. आपल्या समाजासाठी असलेले प्रेम व जिव्हाळा दि.बा. पाटील यांच्या कार्यातून दिसून आले आहे.
देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी दिन-रात कष्ट करून देशाची काळजी घेतो. पण त्याची काळजी कोणीही घेतली नाही. पण दि.बा.पाटील यांनी स्थानिक शेतकऱ्यांसाठी व त्यांचे अस्तित्व टिकुन रहावे यासाठी अनेक लढे दिले. वर्षोनुवर्षे त्यांनी रायगड व ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांना , शेतकऱ्यांना एकत्र घेऊन संघर्ष केला. साल १९७० ते १९८४ इतकी वर्षे सातत्याने संघर्ष केल्या नंतर अखेर १२.५ टक्क्यांच्या कायदा मंजूर झाला व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात १२.५ टक्के एवढा विकसित भूखंड देण्याचा कायदा पुढे आला. या मागे आपल्या समाजाचा विकास व भरभराटी हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून दि.बा. पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा यशस्वी करून दाखवला. समृद्ध नवी मुंबई घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुखांचे नाव न देता विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पालघर , ठाणे , रायगड , मुंबई , विभागातील स्थानिक भूमिपुत्र करत आहेत. त्यामुळे आता नामकरणाबाबत वाद चालले आहेत. प्रत्येक समाजासाठी असंख्य आदर्श व्यक्तींनी कामगिरी केली आहे म्हणून त्या समाजाने त्या आदर्श व्यक्तींवर असलेल्या प्रेम व निष्ठतेसाठी योग्य कार्य करून प्रेरणास्तंभांचे नाव मोठे केले आहे. त्याच प्रमाणे आगरी कोळी कराडी समाजातील स्थानिक भूमीपुत्रांचे प्रेरणास्थान असलेले दि.बा.पाटील यांच्या कार्याप्रति व समाजाच्या अस्तित्वासाठी सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी आता लढा पुकारला आहे. सर्व भूमीपुत्रांनी एकत्र येऊन संघर्षाला सुरुवात केली आहे , तरुणाईने सुद्धा ह्यात आता आपला सहभाग नोंदवला आहे.नवी मुंबई विमानतळाबाबतच्या लढयात समाजाच्या अस्तित्वासाठी सर्वजण एकत्र आले आहेत व हा लढा नक्कीच यशस्वी होईल असा आत्मविश्वास भूमिपुत्रांना दाखविला आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.