न्यूज अपडेट: मुंबई विद्यापीठ कुलगुरू यांच्या राजीनाम्यासाठी आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन चे उपोषण :
मुंबई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील एक महत्त्वाची विद्यार्थी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन संघटनेच्या वतीने दिनांक १७ जून २०२१ पासून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अकार्यक्षम कार्यप्रणाली विरोधात उपोषणास सुरुवात होणार आहे. मुंबई महानगर, उपनगर व कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन प्रश्नासंदर्भात आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन ने कुलगुरू व कुलसचिव यांना वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केलेले आहेत. परंतू कुलगुरू व कुलसचिव यांच्या कडून हेतूपुरस्सर व जाणिवपूर्वक संघटनेने वारंवार केलेल्या तक्रार व कारवाईच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
त्याचबरोबर नियमबाह्य कार्यप्रणाली व गुंडगिरीच्या जोरावर महाविद्यालय ताब्यात घेणा-या प्राचार्य यांना अभय देण्याचा जो पायंडा पाडला जात आहे त्याविरोधात आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन कडून सनदशीर मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंब केला जाणार आहे. मुंबई विद्यापीठ कुलगुरू हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्राचार्य यांना अभय देत आहेत हे सिध्द होत असल्याने उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नाही असे संघटनेचे प्रवक्ता आनंदराज घाडगे यांनी सांगितले.
विशेषत: महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथील परिस्थिती हाताळण्यात कुलगुरू व कुलसचिव हे पूर्णपणे अयशस्वी ठरल्याने संवैधानिक पध्दतीने उपोषणास बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे मत घाडगे यांनी व्यक्त केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठ गुन्हेगारी प्राचार्य यांचेवर प्रशासकीय कार्यवाही करते की त्यांना पाठीशी घालते हा प्रश्न ऐरणीवर आहे. संघटनेतील पदाधिकाऱ्यांवर दबाव आणून १७ जून २०२१ पासून सुरू होणारे उपोषण दडपूण टाकण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले प्राचार्य प्रयत्नशील आहेत असे ही कळले आहे. कुलगुरू आणि कुलसचिव यांनी नियमानुसार दोषीं महाविद्यालय व प्राचार्य यांचेवर प्रशासकीय कार्यवाही करावी त्याचबरोबर संघटनेच्या अनेक प्रलंबित तक्रारीवर ठोस कारवाई व्हावी यासाठीच हे उपोषण आहे असे आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन चे उपाध्यक्ष दिलीप रणदिवे यांनी सांगितले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.