न्यूज अपडेट: राष्ट्रीय वाचन सोहळ्यात मालवणची श्रावणी खोत चमकली..!!
मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अध्यादेशाला अनुसरून शनिवार दिनांक १९ जून २०२१ रोजी ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार पश्चिम यांच्या मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य असा राष्ट्रीय स्तरावर आंतरमहाविद्यालयीन वाचन दिन संपन्न झाला. गुगल मीटवर आयोजित केलेल्या या सुरेख वाचन सोहळ्यात मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक आणि स्तंभलेखक सॅबी परेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
देशभरातील वाचन प्रेमींना संबोधित करताना सॅबी परेरा म्हणाले, "फेसबुक, वॉटस् अप इत्यादी समाज माध्यमांवर सामायिक झालेले साहित्य वाचल्यामुळे फारतर वाचक समाज निर्माण होईल परंतु ग्रंथांचे आणि पुस्तकांचे वाचन केले तरच वाचन संस्कृती निर्माण होऊन समाजाचे उन्नयन होईल." ते पुढे म्हणाले,"तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केवळ शासनाने करावे असे नाही, तर ती जबाबदारी पालकांनी आणि ज्ञानदीप मंडळा सारख्या संस्थांनी स्वीकारायला हवी." सॅबी परेरांनी कुपारी बोलीत सादर केलेल्या स्वरचित कवितेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या राष्ट्रीय वाचन सोहळ्यात मालवणची श्रावणी खोत चमकली. टोपीवाला महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या श्रावणीने मालवणी बोलीत लिहिलेल्या किसन पेडणेकर यांच्या 'भिरंडा' या विनोदी कथेतील एका भागाचे वाचन करून उपस्थितांची शाबासकी मिळवली.
या वाचन सोहळ्यात बोलताना ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो म्हणाले, "ययाती, छावा या सारखी अनेक दर्जेदार पुस्तके आम्ही मराठी माध्यमातून शिकल्यामुळे शालेय जीवनात वाचता आली. आपापल्या उद्योग व्यवसाय याच्याशी संबंधित वाचनाने आपण आपल्या क्षेत्रात चांगली प्रगती करू शकतो." या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या भूतपूर्व प्राचार्या डॉ. जयश्री मेहता यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी वाचक प्रेमींना संबोधित करताना एकच विधान विविध अंगाने कसे वाचता येते आणि त्याची परीणामकारकता वाढविता येते, हे उदाहरण देऊन पटवून दिले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सुभाष डिसोझा यांनी आपल्या भाषणात कुपारी बोलीत प्रचलित असणार्या म्हणी बोलून दाखविल्या. त्यांनी आपल्या मनोगतातून वाचना बरोबर बोली भाषांचे महत्व अधोरेखित केले.
कान तृप्त करणारा वाचन समारंभ 'वसई फास्ट' दैनिकाचे संपादक मोहन पाटील यांच्या उपस्थितीने अधिक उठावदार झाला. ते आपल्या भाषणात म्हणाले, "वाचनाने अफाट ज्ञान तर मिळतेच पण वाचन हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे." ते पुढे म्हणाले,"प्रत्येक संपादकाला भरपूर वाचावे लागते कारण तेच अग्रलेख लिहिताना उपयुक्त ठरते."
सदर राष्ट्रव्यापी वाचन समारंभाची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणारे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख सहा प्रा. जगदीश संसारे यांनी मान्यवरांची ओळख करून दिली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि आपल्या सहज ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन देखील केले. वाचन दिनाचे सहआयोजक ग्रंथपाल डॉ. दिनेश सनदी यांनी उपस्थित वाचन प्रेमी आणि मान्यवरांचे लाघवी भाषेत आभार मानले. अनएडेड वाणिज्य विभाग प्रमुख सहा प्रा. संगिता पंडित यांनी कार्यक्रमाची तांत्रिक बाजू भक्कमपणे संभाळली.
संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी अंतर्गत पार पडला -
कर्नाटक, गोवा, झारखंड, तमिळनाडू, गुजरात या राज्यातील मराठी भाषा आणि वाचन प्रेमींनी उपक्रमात आपला सहभाग नोंदवला, हे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले. महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सहा. प्रा. प्रसाद डाबरे (सुवर्णकण) कार्यालयीन अधीक्षक विल्यम रॉड्रीग्ज (बायबल) यांनी देखील उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. सहा. प्रा. प्रणिता बिलोलीकर (झारखंड), ग्रंथपाल डॉ. संतोष कांबळे (चेन्नई) यांनी देखील अनुक्रमे महात्मा गांधी आणि ड। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील उतार्यांचे वाचन केले. अनुश्री पाटणकर (झारखंड) व प्रफुल्ल काळे (गुजरात), दिपाली शेट्ये (कर्नाटक), श्रावणी सुर्वे आणि वैष्णवी नाईक (गोवा) यांनी उपक्रमात सहभाग नोंदवला.
होली क्रॉस हायस्कूलचे माजी उपप्राचार्य फ्रान्सिस आल्मेडा, महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले समुपदेशक प्रा. रॉबर्ट आल्मेडा, समाजसेवक जाॅन परेरा तसेच अनेक महाविद्यालयातील वाचनप्रेमी प्राध्यापकांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती.
ज्ञानदीप मंडळाचे दोन्ही उपाध्यक्ष वेलेरीयन रॉड्रीग्ज आणि जो अल्फान्सो, सचिव स्टॅनी लोबो तसेच खजिनदार टोनी डाबरे यांनी केलेले मार्गदर्शन तितकेच महत्त्वाचे ठरले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.