न्यूज अपडेट: पावसाळ्यामध्ये पोटाच्या विकारांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ..!
● रस्त्यावरील खाद्यपदार्थ हगवण व जुलाबाला ठरतायेत कारणीभूत
ठाणे (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- बदलत्या जीवनशैलीमुळे खाणे-पिणे, झोप, मानसिक स्वास्थ आणि आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, पोटाच्या लहानसहान तक्रारीही भविष्यात गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत परंतु पावसाळ्यामध्ये बाहेरील पदार्थ खाल्ल्यामुळे आता पोटविकारांमध्ये वाढ झाल्याचे निदेर्शनास आले आहे. पावसाळ्यात अनेकांना बाहेरचे गरमागरम पदार्थ खायला आवडतात विशेषतः तळलेले पदार्थ म्हणजेच कांदा - बटाटा भजी तसेच चायनीज पदार्थांचा मोह आवरता येत नाही परंतु हेच पदार्थ पोटाच्या विकाराला कारणीभूत ठरत आहे, कल्याण शहरातील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्वेक्षणानुसार पावसाळ्यामध्ये बाहेरील खाद्य पदार्थ खाल्यामुळे पोटाच्या विकारात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे तसेच किडनीच्या विकारातही लक्षणीय वाढ झाली आहे. खाद्यपदार्थ खाल्ल्यावर तेथे उपलब्ध असलेले निकृष्ट दर्जाचे पिण्यासाठी पाणी व खाण्याच्या पदार्थावर घोंघावणाऱ्या माश्या यातून बरेचदा जिवाणूंना आपल्या शरीरात प्रवेश करायला आयती संधी मिळत आहेत.
याबाबत माहिती देताना स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व फिजीशियन आणि इंटेंसिव्हिस्ट डॉ. प्रदीप शेलार सांगतात, " गेल्या १५ दिवसात हगवण व जुलाबाचा त्रास असलेल्या पेशंटमध्ये ३० टक्के वाढ झाली असून स्टारसिटी हॉस्पिटलने केलेल्या अंतर्गत सर्वेसक्षणानुसार या आजारासाठी बाहेरील खाद्यपदार्थ कारणीभूत ठरत आहेत. भट्टीशेजारी काम करणाऱ्या आचाऱ्यांची स्थिती अधिक वाईट असते त्यांना येणाऱ्या सततच्या घामामुळे जीवाणूंचा संसंर्ग वाढण्याचा धोका असतो अन्न शिजवताना, वाढताना हातमोजे (ग्लोव्ह्ज ) घालणे फार महत्वाचे आहे. डोसा, पावभाजी, चहा असे पदार्थ गरम असल्याने त्यातून संसर्ग कमी होतो परंतु मात्र सॅण्डविच, भेळपुरी-शेवपुरी- चायनीज , फ्रॅंकी - भजी अशा पदार्था साठी कांदा, टोमॅटो कोथींबीर खूप आधीपासून चिरलेले असण्याची शक्यता असल्याने त्यातून ई-कोलाय, कॉलीफॉर्म, स्टॅफिलोकोकस ऑरिअस अशा हगवण व जुलाबाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा संसर्ग होत असतो. सहज उपलब्ध होणारी रस्त्यावरील लिंबू पाणी, ताक, फळांचे ज्यूस, कोल्ड्रिंक आणि इतर ड्रिंक्ससुद्धा पोटांच्या विकाराला कारणीभूत ठरत आहेत. "पावसाळ्यामध्ये पोटाच्या विकारांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, गॅस आहे म्हणून काहीजण सोडा पितात, मेडिकल दुकानातील औषधे घेतात परंतु सतत पोट दुखायचा त्रास सतत होत असेल तर घरगुती औषधोपचारांवर अवलंबून राहू नये अशी माहिती डॉ. प्रदीप शेलार यांनी दिली.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.