न्यूज अपडेट: ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य पोलादपूर..!!
पोलादपूर (प्रतिनिधी/मिलिंद खारपाटील) :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला रायगड किल्ला ही रायगड जिल्ह्याची शान आहे. या रायगड जिल्ह्यात अनेक शूर मावळे, सरदार होऊन गेले. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी देव, देश आणि धर्म यांसाठी आपले प्राण पणास लावले.
उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांचे कुडपण चे शेलारमामा यांनी क्रूरकर्मा उदयभान यास कंठस्नान घालून मोगलांच्या ताब्यातील कोंढाणा जिंकला. मुलगा रायबाचे लग्न बाजूला ठेवून स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण तानाजीने दिले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की गड आला पण माझा सिंह गेला आणि या कोंढाणा किल्ल्याला त्यांनी सिंहगड हे नाव दिले.
नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुतळा उमरठ येथे आहे. तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांची समाधी उमरठला आहे. आज तानाजी मालुसरे यांचे वंशज उमरठ, साखर, महाड येथे आहेत. तर शेलारमामा यांचे वंशज कुडपण येथे आहेत. याचबरोबर सरनौबत पिलाजी गोळे, सरदार सूर्याजी मालुसरे, सरदार गोदाजी जगताप, सरदार बाजी बांदल या सरदारांचे आणि अनेक मावळ्यांचे वंशज पोलादपूर तालुक्यात वास्तव्यास आहेत. साखर येथे सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांना शिवाजी महाराजांनी दिलेली कवड्याची माळ त्यांच्या वंशजांनी जपून ठेवली आहे. इतिहासाची थोर परंपरा आपण जपली पाहिजे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पोलादपूर तालुक्यावर निसर्गाने मुक्त हसे उधळण केली आहे. मिनी महाबळेश्वर किंवा रायगड चे काश्मीर म्हणून ओळख असलेले कुडपण हे थंड हवेचे ठिकाण आहे. भिमाची काठी, ८०० फुटावरून कोसळणारा रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा धबधबा, राजाराणी पॉईंट येथे आहे. ७०० पाकिस्तानी सैन्याला ठार मारून भारताला विजय मिळवून देणाऱ्या महावीर चक्राने सन्मानित सुभेदार कृष्णा सोनावणे यांचे स्मारक इथे आहे.
मात्र तिथे या महापराक्रमी वीराचे शासकीय स्मारक होणे जरुरी आहे. कुडपण येथे शेलारमामा यांचे वंशज आहेत. इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्यासाठी कुडपण येथे शेलारमामा यांचे स्मारक होणे ही काळाची गरज आहे. असे म्हटले जाते की जी माणसे इतिहास जपतात, तीच माणसे पुढे इतिहास घडवतात. सावित्री, घोडवनी, चोळई, जगबुडी या नद्यांनी येथील परिसर समृद्ध बनवला आहे.
रानबाजीरे धरण पोलादपूरवासीयांची तहान भागवत आहे. भविष्यात पांगळोली येथे तयार होणारे धरण हे या भागातील गर्द वनश्री आणि भाजीपाला आधिक फुलवणार आहे. येथील जंगल ग्रामस्थानी जननी कुंभळजाई देवीच्या ताब्यात दिल्याने जंगलतोड होत नाही. कोतवाल येथे कालकाई मातेचे प्रशस्त मंदिर आहे. घागरकोंड येथील झुलता पूल आणि नायगारा सदृष्य धबधबा पहायला हजारो पर्यटक दरवर्षी येतात. मोरझोत चा धबधबा पावसाळी पर्यटकांना आकर्षित करतो. निसर्गाचा वरदहस्त लाभल्याने काही चित्रपटांचे चित्रीकरण आड, कुडपण येथे झाले आहे.
आषाडी, कार्तिकी एकादशीला हजारो भाविक तुर्भे बुद्रुक येथील लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शनासाठी येतात. नवसाला पावणाऱ्या लक्ष्मीनारायणाचे मंदिर खरोखर पाहण्यासारखे आहे. देवपूर येथील शिवमंदिर आणि वाघजाई कोंडजाई मंदिरात अनेकजण दरवर्षी येतात. पोलादपूर येथे भरणारी कालभैरव यात्रा हे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे आकर्षण आहे. रामनवमीला जिल्ह्यातील अनेक रामभक्तांची पावले धामणदेवीला वळतात. कापडे येथील रामवरदायिनी मंदिर आणि इथे भरणारी यात्रा पोलादपूर आणि महाड वासीयांचे श्रध्दास्थान आहे. प्रतापगड किल्याच्या पायथ्याशी देवळे येथे असणारे पुरातन शिवपुराण मंदिर हे लाखो शिवभक्तांच श्रध्दास्थान आहे. शिवकालीन कवी परमानंद यांचे पोलादपूर येथे स्मारक आहे.
आकाशाला भिडणाऱ्या सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगा, महाबळेश्वर वरून कोकणात येणारी एकमेव सावित्री नदी देखील इथले आकर्षण आहे. आंबा, फणस, काजू , कोकम या फळांबरोबर दूध, दही, तूप आणि मध यांनी पोलादपूर संपन्न आहे. पोलादपूरची लसणीची चटणी आणि कुडपणची तिखट चटणी रायगड जिल्ह्यात प्रसिध्द आहे. येथील नद्यांमध्ये मळे, डाकू, खऊल, वाम हे सापडणारे मासे मत्स्यखवय्यांची भूक भागवतात.जंगली रानभाज्या विपुल प्रमाणात सापडतात. कोंढवी, कांगोरीगड आणि ओंबळी येथील मीठखडा किल्ला हे दुर्गभ्रमती करणार्यांना भुरळ घालतात. इथला आंबेनळी आणि कशेडी घाट पर्यटकांना साद घालतो.
पोलादपूर मधील अनेक जण आज सैन्यदलात आणि पोलीस मध्ये आहे. फौजी देवपूर म्हणून ओळखले जाणारे देवपूर पोलादपूर मधीलच.. तालुक्यातील अनेक जण वारकरी सांप्रदायात आहेत. येथील अखंड हरिनाम सप्ताहात हजारोच्या संख्येने वारकरी उपस्थित असतात. पोलादपूर तालुका सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. महाबळेश्वर आणि गोवा येथे इथूनच रस्ता जातो. भविष्यात कुडपण मार्गे महाबळेश्वर आणि ओंबळीमार्गे खेड हे महामार्ग बनले तर पोलादपूर च्या विकासाची दारे निश्चितच खुली होतील. ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या पोलादपूर चा विकास पर्यटनाच्या माध्यमातून निश्चितच करता येईल. मुंबई, पुणे, बडोदा येथे कामानिमित्त जाणारा तरुणवर्ग इथेच राहील. इथल्या बेरोजगाराना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळेल. या पोलादपूर तालुक्याबद्दल मला असे म्हणावेसे वाटते की प्रयाग, काशी, मथुरा , वृंदावन हे कोणाला नसेल ? ठेवा पोलादपूर त्या हतभाग्याला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.