न्यूज अपडेट: "महा हॅण्डलूम्स" या बोधचिन्हाचे अनावरण..।।
मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित हे महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत प्रतिष्ठान असून सन १९७१ पासून हातमाग व्यवसायाशी जुळलेले आहे. महाराष्ट्रातील परंपरागत हातमाग व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी व कुशल हातमाग विणकराव्दारे उत्पादीत उच्च प्रतीच्या कापडाची ओळख कायम असावी व विणकरांना रोजगार उपलब्ध होत राहावे, या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाव्दारे करार पध्दती अंतर्गत विणकराकडून उत्पादन करुन घेण्यात येते व अशा उत्पादीत मालाच्या विक्रीची व्यवस्था विक्री केंद्रे, प्रदर्शनी तथा ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात येते. कोविड-१९ संसर्गामुळे संपूर्ण देशात मंदीचे वातावरण असून आर्थिक परिस्थिती डबघाईची झालेली आहे. प्रदर्शनी, मेळावे व उत्सव घेणे शक्य नाही.
हातमाग विणकरांनी तयार केलेल्या वस्त्रांच्या विक्रीवर आर्थिक मंदीमुळे फटका बसलेला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन काळात विणकराला (Work From Home) अंतर्गत आवश्यक सूत पुरवठा करणे, त्यांना मजूरी देणे; जेणेकरुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, याकरीता हातमाग महामंडळाशी जुळलेल्या विणकरांना लॉकडाऊन काळात नियमीत रोजगार पुरविण्याकरीता हातमाग महामंडळ कसोशीने प्रयत्न करीत आहे. हातमाग महामंडळाव्दारे उत्पादीत हातमाग वस्त्रांना बाजारपेठेत योग्य स्थान मिळावे, याकरीता नविन रुप देण्याच्या दृष्टीने "महा हॅण्डलूम्स" या नावाने बोधचिन्ह तयार करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नविन बोधचिन्हाचे अनावरण आज दिनांक १४ जुलै २०२१ रोजी मा. ना. श्री. असलम शेख, मंत्री, वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते तथा मा. ना. श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, मा. श्री. पराग जैन, भा.प्र.से., प्रधान सचिव, वस्त्रोद्योग व श्रीमती शीतल तेली-उगले, भा.प्र.से., आयुक्त वस्त्रोद्योग व व्यवस्थापकीय संचालक, हातमाग महामंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नविन बोधचिन्हामुळे आधुनिक युगात / बाजारपेठेत हातमाग वस्त्रांची खरोखर छाप पडेल व याचा फायदा रोजगारीचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करुन मा. मंत्री महोदयांनी शुभेच्छा दिल्या.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.