न्यूज अपडेट: प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सृजनात्मकता दडलेली असतेच - प्राचार्य डॉ. लीना राजे!
मुंबई (प्रतिनिधी/ गुरुदत्त वाकदेकर) :- ‘आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास जयंती म्हणून साजरा केला जातो. आषाढ महिन्याचे आगमन होताच कवितेची चाहूल लागते आणि कवितेच्या गावी जावे असेच वाटत रहाते. कविता गावीशी वाटणे, गाणे गुणगुणावेसे वाटणे आणि हे करताना सहजच त्या काव्यात एकात्म पावणे हा एक अद्वैतानुभवच आहे. कविता म्हणजे तरी काय तर सृजनात्मकता माझ्या मते, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सृजनात्मकता ही असतेच’’ असे उद्गार ‘मुली रंगल्या काव्यात’ ह्या स्वरचित कवितेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी सेवा मंडळ एज्यूकेशन सोसायटी संचालित श्रीमती एम. एम. पी. शाह महिला स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. लीना राजे ह्यांनी काढले. मराठी विभाग आणि विश्वभान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुली रंगल्या काव्यात’ ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विश्वभान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. जगदीश संसारे ह्यांच्या मार्गदर्शनाने ‘मुली रंगल्या काव्यात’ ह्या आंतरमहाविद्यालयीन दहा विद्यार्थींना एकत्र घेऊन आताच्या काळाशी निगडीत नानाविध विषयांवरच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अप्रतिम सुश्राव्य सूत्रसंचालन श्रावणी खोत हिने केले. निसर्ग, आई-वडिल, कोराना, ऑनलाईन शाळा, स्त्रीकडे पाहण्याची समाजाची दृष्टी ह्याविषयांवर श्रावणी खोत (मालवण), माधवी पवार (मुंबई), प्रियंका जोगदंड (मुंबई), तेजस्वी कांबळे (खेड), चैताली दहिंबेकर (कोलाड), पायल कासारे (महाड), काजल जाधव (फलटण), वेदश्री डोंगरे (अलिबाग), श्रुतिका घोलप (मुंबई) आणि वेलेंटीना नांगऱ्या (विरार) अशा महाराष्ट्रातील विद्यार्थींनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. तासभर चाललेल्या कार्यक्रमात अधिक रंगत चढल्यावर उपस्थित मराठी विभाग प्रमुख प्रा. वसंत पानसरे ह्यांनी मंगेश पाडगावकर ह्यांची ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आणि आमचे सेम असते’ ही कविता सादर केली तर हिंदी विभाग प्रमुख डॉ. उषा मिश्रा ह्यांनी हिंदी कवितेचे सादरीकरण केले तसेच उपस्थित विद्यार्थीनी गीता गावडे हिने देखील स्वरचित कविता सादर केली. कार्यक्रमाची सुरूवात डॉ. रश्मी शेटये-तुपे ह्यांनी केली तर आभार प्रदर्शन वेदश्री डोंगरे हिने केले. सदर कार्यक्रमास उपस्थित महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थींनी आणि शिक्षकेतर कर्मचारी होते. कोरोनाच्या प्रार्दूभाव असल्यामुळे कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पडला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.