न्यूज अपडेट: कविता जगण्याचे बळ देते- डॉ सुभाष डिसोझा:
मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा विरार पश्चिम यांच्या मराठी विभागाने महिला सक्षमीकरण व मराठी भाषेचा विकास या उपक्रमांतर्गत ‘मुली रंगल्या काव्यात’ ह्या स्वरचित कवितेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात कविते विषयी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष डिसोझा म्हणाले, "कविता जगण्याचे बळ देते." ते पुढे म्हणाले, ‘‘आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास जयंती म्हणून साजरा केला जातो.
आषाढ महिन्याचे आगमन होताच कवितेची चाहूल लागते आणि कवितेच्या गावी जावे असेच वाटत रहाते. कविता गावीशी वाटणे, गाणे गुणगुणावेसे वाटणे आणि हे करताना सहजच त्या काव्यात एकात्म पावणे हा एक अद्वैतानुभवच आहे. कविता म्हणजे तरी काय तर सृजनात्मकता माझ्या मते, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सृजनात्मकता ही असते.’’ महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.जगदीश संसारे ह्यांच्या मार्गदर्शनाने ‘मुली रंगल्या काव्यात’ ह्या आंतरमहाविद्यालयीन काव्योत्सववाची संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात अंमलात आली. महाराष्ट्रातील दहा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एकत्र आणून संसारे यांनी आताच्या काळाशी निगडीत नानाविध विषयांवरच्या त्यांच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करून घेतले.
कार्यक्रमाचे अप्रतिम, सुश्राव्य आणि लाघवी भाषेत सूत्रसंचालन श्रावणी खोत हिने केले. निसर्ग, आई-वडिल, कोराना, ऑनलाईन शाळा, स्त्रीकडे पाहण्याची समाजाची दृष्टी ह्याविषयांवर श्रावणी खोत (मालवण), माधवी पवार (मुंबई), प्रियंका जोगदंड (मुंबई), तेजस्वी कांबळे (खेड), चैताली दहिंबेकर (कोलाड), पायल कासारे (महाड), काजल जाधव (फलटण), वेदश्री डोंगरे (अलिबाग), श्रुतिका घोलप (मुंबई), वेलेंटीना नांगऱ्या (विरार), प्रिया कोटरंगे (यवतमाळ) अशा महाराष्ट्रातील विद्यार्थींनी स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाची अधिक रंगत चढण्यास डॉ. सुभाष डिसोझा यांनी कादोडी भाषेत सादर केलेल्या कवितेनेच सुरू झाली.
सहज सोप्या भाषेत आभार प्रदर्शन वेदश्री डोंगरे हिने केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थींनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह इतर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि रसिक उपस्थित होते. कोरोनाच्या प्रार्दूभाव असल्यामुळे कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पडला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.