न्यूज अपडेट: नवी मुंबईत दि बा पाटील यांच्या नावासाठी 9 ऑगस्टला निघणार मशाल मोर्चा:
पनवेल (प्रतिनिधी) :- ९ ऑगस्ट हा दिवस ' क्रांती दिन. १९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या दिवशी मुंबई येथील गोवालिया टॅक येथून समस्त भारतीयांना 'अंग्रेज चले जाओ' अशी हाक दिली. नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात 'मशाल मोर्चा' काढण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी गुरुवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली .
पनवेल येथील पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर , कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कामगार नेते भूषण पाटील, उपमहापौर जगदिश गायकवाड, संतोष केणे, सुरेश पाटील, गुलाब वझे, जे.डी. तांडेल, दीपक म्हात्रे, राजेश गायकर, मनोहर पाटील, विनोद म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते . लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की, प्रत्येक मशाल ही दि. बा. पाटील यांनी दिलेल्या क्रांतीच्या लढ्याची ओळख असेल. त्यामुळे प्रत्येक गाव आपल्या भूमिपुत्रांच्या व्यथा या मशाल मोर्चाद्वारे मांडणार आहे. आणि मशाल मोर्चात शपथ घेऊन पुढच्या तीव्र आंदोलनाची दिशा जाहीर करणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. नावाबाबत केंद्राला घाई नाही मात्र ठराविक नाव देण्याची घाई महाराष्ट्र सरकारला झाली, त्यामुळेच संघर्षाची लढाई सुरु झाली पण हि लढाई जिंकण्यासाठी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त मैदानात उतरला आहे. १५ ऑगस्ट सरकारला डेडलाईन दिली आहे, या तारखेपर्यंत सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने न्याय द्यावा, अन्यथा १६ ऑगस्ट पासून विमानतळाचे काम बंद पाडले जाईल, अशी रोखठोक भूमिका मांडत कदापिही मागे हटायचे नाही, दिबासाहेबांचे नाव विमानतळाला लागेपर्यंत हटायचे नाही, अशी गर्जनाही केली.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.