न्यूज अपडेट : नकली दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे वाढत आहे कर्करोगाचा धोका:
● मिठाईच्या समाप्त तारखेच्या नियमांबाबत सामान्य नागरिक बेफिकिर
ठाणे (प्रतिनिधी/ अक्षय तांडेल) :- सध्या महाराष्ट्रात सण -उत्सवाचे दिवस सुरु असून या काळात मिठाई व इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढते, अनेक नागरिक आपल्या घराजवळील दुकानांमधून मिठाई व इतर पदार्थ विकत घेत असतात पंरतु हे दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी असली दुधाचा वापर झाला आहे का याबाबत त्याना माहिती नसते. मुंबई व लगतच्या शहरांमध्ये नकली दूध बनविणाऱ्या टोळ्या कार्यरत असून पोलीस व सरकारी यंत्रणा यांच्यावर योग्य ती कारवाई करत असते परंतु या सर्व प्रकारांमुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अभय गायकवाड सांगतात," अशुद्ध पाण्याच्या भेसळीमुळे दुधातील स्निग्धांश तर कमी होतो परंतु जुलाब, उलट्या, जंत, आतड्याचे विकार, टायफॉईड, नारू, सिस्टोसोमियासीस असे आजार होतात. तसेच त्यांच्या साथी देखील मोठ्या प्रमाणात पसरू शकतात. दुधामध्ये फक्त पाण्याचीत भेसळ होते असे नाही, तर त्यात त्याहूनही अधिक घातक पदार्थ मिसळले जातात. लोणी,तूप यांसारखे दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी दुधातून मलई(फॅट) काढून घेतली जाते. त्यामुळे दुधातील स्निग्धांशाचे(फॅटचे) प्रमाण कमी होते, दूध खरेदीच्या तपासणीत फॅट कमी आढळल्याने ते डेअरीमध्ये नाकारले जाते. हे टाळण्यासाठी दुधात युरिया,स्टार्च, ग्लुकोज व अन्य पदार्थ मिसळून फॅटचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. दुधात डिटर्जंट, युरिया कॉस्टिक सोडा, ऍसिडस्, अमोनियम सल्फेट,मेलामाइन, स्टार्च-साखर-तवकील यांसारख्या रासायनिक पदार्थांची सर्रासपणे भेसळ केल्यामुळे किडनीचे आजार व कर्करोगाचा धोका वाढतो.
भारतात आज २५ ते ३० लाख कर्करुग्ण आहेत. दरवर्षी यात १२ लाखांची भर पडते. दरवर्षी सात लाख रुग्णांचा यामुळे जीव जातो त्यामुळे आपण भेसळयुक्त अन्न अथवा दुग्धजन्य पदार्थांपासून कसे मुक्त राहू यावर मंथन करणे गरजेचे आहे. आता सरकारी नियमाप्रमाणे मिठाईवर सुद्धा समाप्त तारीख लिहिणे गरजेचे आहे पंरतु अनेक नागरिक यावर लक्ष देत नाहीत व पैसे देऊन आजार विकत घेतात."
दुधातील मोठ्या प्रमाणात होणारी भेसळ लक्षात घेवून भारत सरकारने १९५४ साली अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा करून शिक्षेची तसेच दंडाची तरतूद केलेली आहे. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकस रिसर्च ‘आयसीएमआर’ संस्थेने केलेल्या अभ्यासात दूध भेसळीमुळे क्षयरोग होत असल्याचे दिसून आले. तसेच दुधात युरियाची भेसळ असल्यास त्याचा मूत्रपिंड, यकृत व हृदयावर परिणाम होत असून कॉस्टिक सोडय़ामुळे लहान मुलांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे अशी माहिती सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभय गायकवाड यांनी दिली.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.