शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख श्रमिका दळवी यांची जिल्ह्यात पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात..!
शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख श्रमिका दळवी यांची जिल्ह्यात पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात..!
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :-
शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुखाचा पदभार स्वीकारुन श्रमिकाताई दळवी यांनी जिल्ह्यात पक्षबांधणीच्या कामाला जोरदार सुरुवात केली आहे, दि. १५ डिसेंबर पासून त्यांनी जिल्ह्यातील हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन विविध विषयावर चर्चा केली, तर काही सामाजिक प्रकल्पांना भेटी देऊन विस्तृत माहिती जाणून घेतली.
शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुखाची जबाबदारी श्रमिकाताई दळवी यांच्यावर नुकतीच सोपवली आहे. त्याचा फायदा तळागाळातील जनतेच्या हितासाठी करणार असल्याचे श्रमिकाताईंनी सांगितले आहे.
संपर्कप्रमुख श्रमिकाताई दळवी यांनी जिल्ह्यात दाखल होऊन देवगड, मालवण, वैभववाडी, कणकवली या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, शिवाय शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपर्क कार्यालयांना भेट दिली, त्यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. मात्र अचानक डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे श्रमिकाताईंनी सावंतवाडी, वेंगुर्ले, आंबोली येथील दौरा थांबवला.
दरम्यान नवसाला पावणाऱ्या जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन श्रमिकाताई दळवी यांनी घेतले, त्यानंतर त्यांनी कुडाळ एमआयडीसी येथील बांबू कंपनीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आणि त्या मुंबई येथे रवाना झाल्या. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी पुन्हा २२ आणि २३ डिसेंबर दोन दिवसांचा जिल्हा दौरा केला. या काळात मालवण तालुक्यातील दांडी आणि वायरी गावात भेट देऊन पक्षबांधणी केली. तसेच कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे उद्घाटन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
श्रमिकाताई दळवी नक्की कोण आहेत....?
श्रमिकाताई प्रमोद दळवी यांचे कणकवली जवळील हुंबरट येथे सासर असून देवगड तालुक्यातील फणसगाव हे त्यांचे माहेर आहे. मात्र त्या नोकरी व्यवसायानिमित्त नवी मुंबई येथे राहतात. त्यांनी यापूर्वी सामाजिक क्षेत्रात खूप चांगली कामगिरी केली असून आजही त्या लोकहितासाठी कार्यरत असतात. श्रमिकाताई दळवी आत्मनिर्भर फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत. शिवाय त्या स्पीच थेरेपीस्ट असून मानसोपचार आणि भाषा उपचार तज्ञ आहेत. त्यांचे शालेय शिक्षण एम. ए. बीएड (HI) रेमेडीयल एज्युकेटर पर्यंत झाले आहे. त्या दोषनिवारक अध्यापन करतात. तसेच महिला सक्षमीकरणासाठी तत्पर असतात.